Wednesday, February 25, 2015

वो हम न थे,वो तुम न थे। …… 

सुमारे तीन एक वर्षापुर्वी रफ़ी साहेबांच्या आवाजात काही शब्द कानावर पडले।रफ़ी साहेबांची इतकी गाणी पाठ असून सुद्धा,हे गाणं आपण ऐकायचं कसं राहून गेलं असं वाटत राहिलं।एक कवि अचूकपणे कसं सर्वांच्या मनातलं बोलून जातो आणि ते गाणं आपल्याला आपलं वाटायला लागतं।

गुजर रही है तुम पे क्या,बना के हम को दर ब दर,
ये सोच कर उदास हू,ये सोच कर है चश्म तर
न चोट है ये फूल की,न है खलिश ये खार की
लूटी जहा पे बेवजह,पालकी बहार की

चश्म तर --पाणावलेले डोळे
खार ---काटा

प्रेमात काही कटु अनुभव किंवा विरह सहन करून सुद्धा,आपल्या प्रिय व्यक्तिच्या व्यथेचीच काळजी।
केवढा हा निःस्वार्थ,फ़क्त शुद्ध भावनांची ,खऱ्या प्रेमाची साक्ष देणारा।

गुजर रही है तुम पे क्या। ……ज्या व्यक्ति कडून दुःख मिळालं,त्याच व्यक्ति बद्दल काळजीचे,सहनुभूतीचे सूर.…

कवि गोपालदास 'नीरज' यांच्या लेखणीतून आलेले शब्द। … प्रत्यक्ष सलाम नहीं करता आला तरी मन मात्र अशा प्रतिभे समोर आपोआप नतमस्तक होवून जातं।
१९६४ च्या चा चा चा या चित्रपटातील हे गाणं।इकबाल कुरैशी साहेबांचं संगीत,रफ़ी साहेबांचा स्वर आणि एक से एक सुन्दर गाणी आहेत या चित्रपटात ।पण हे गाणं मला सगळ्यात भावलेलं।

"वो हम न थे,वो तुम न थे
वो रहगुजर थी प्यार की
लूटी जहा पे बेवजह
पालकी बहार की"

ते माझं किंवा तुझंही नव्हतं,ते एका समान धाग्याच्या बंधनाचं अस्तित्व होतं।
आज ते बंधन काही कारण नसताना मोकळं झालंय। हा 'बेवजह' शब्द नीरज यांनी इथे फार
परिणाम साधत वापरलाय।

चार कड़वी,प्रत्येक शब्द किती अर्थपुर्ण।

विशेषत: तिसरा अंतरा।।।।।।
ये कौनसा मक़ाम है
फलक नहीं,जमीं नहीं
ये शब नहीं,सहर नहीं
के गम नहीं,ख़ुशी नहीं
कहा ये लेके आ गयी,हवा तेरे दयार की
लूटी जहा पे बेवजह
पालकी बहार की
(दयार---घर)

मनात जी एक पोकळी निर्माण झाली आहे,त्या पोकळीचं या पेक्षा सुन्दर ते काय वर्णन असू शकणार।
हे निर्विकार मन मला तुझ्या अस्तित्वाच्या दिशेनी घेवून गेलं आणि जिथे त्यानी मला आणून सोडलंय,तिथे
सुख दुःख राग लोभ या कशाचाच परिणाम नाहीये।सगळंच शून्य आहे.सगळंच शून्य आहे.

गोपालदास सक्सेना 'नीरज' यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या इटावा जिह्यातल्या पुरावली या खेड्यात झाला।कानपूरहून एम.ए. झाल्यावर ते अलीगढ़ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले।महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना कविता करण्याचा नाद जडला।आणि अल्प कलावधीतच नीरज हे एक उत्तम कवी म्हणून मान्यता पावले।१९६० साली नीरज एका कार्यक्रमासाठी मुंबईला आर.चंद्रा नावाचा एक तरुण चित्रपट निर्माता त्यांना येऊन भेटला।तो देखील अलीगढ़ विद्यापीठाचा विद्यार्थी होता।त्याने 'बरसात की रात' नावाचा चित्रपट आधी बनवला होता।आता तो 'नयी उमर की नयी फ़सल' या आपल्या नव्या चित्रपटाची तयारी करत होता।या नव्या चित्रपटसाठी नीरज यांनी गीतलेखन करावं अशी त्याची विंनती नीरज यांनी मान्य केली।पण काही ना काही कारणानी तो चित्रपट रखडला।पण इक़बाल कुरैशी यांचं संगीत असलेला 'चा चा चा' मात्र नीरज यांना मिळाला।'सुबह न आयी',एक चमेली के मंडवे तले','वो हम न थे' सारख्या अप्रतिम रचना नीरज यांनी दिल्या आणि या चित्रपट सृष्टीला एक प्रतिभाशाली कवी लाभला।नंतर प्रदर्शित झालेल्या 'नयी उमर की नयी फ़सल' मधल्या 'कारवाँ गुज़र गया' गीत एक इतिहास रचून गेलं।शैलेंद्रच्या निधनानंतर शंकर जयकिशन एका नव्या गीतकाराच्या शोधात होते।तेव्हा नीरज त्यांच्या पसंतीस उतरले।१६६८ चा 'दुनिया' हा या गीतकार-संगीतकार जोडीचा पहिला चित्रपट।त्यानंतर त्यांनी 'चंदा और बिजली','पहचान' मेरा नाम जोकर','लाल पत्थर','कल आज और कल' असे तब्बल सोळा चित्रपट केले।सचिन देव बर्मन यांच्या सोबतही नीरज यांची मस्त जोडी जमली।'प्रेम पुजारी','गैम्ब्लर','शर्मीली','तेरे मेरे सपने' या त्यांच्या चित्रपटातील संगीतानी रसिकांच्या मनात घर केलं।एवढं यश मिळूनही या चित्रपट सृष्टीत नीरज फार रमले नाहीत व स्वगृही परतले।हिंदी साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव मोठया सन्मानाने घेतलं जातं।'नीरज की पाती','बादलों से सलाम लेता हूँ' असे त्यांच्या अनेक संग्रहांना लोकप्रियता लाभली।२००७ साली त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला।        







No comments: