Tuesday, November 24, 2015

दरवर्षी दिवाळी घरी-दारी आनंद घेवून येते। आपण सर्वजण मोठ्या आतुरतेने या सणाची वाट पाहत असतो।दिवाळीच्या निमित्ताने एक चैतन्य आपण अनुभवत असतो। नव्या उमेदीची,नव्या क्षणांची ही पहाट हळूहळू नूतन वर्षाची दारं उघडून देत असते।नवे कपडे,दिवाळीचा फराळ,आप्तेष्टांच्या गाठीभेटी दीपावलीचा अविभाज्य भाग असतात।पण रसिक वाचकाचं मन मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर येणाऱ्या दिवाळी अंकांची वाट पाहत असतं।सगळेच दिवाळी अंक विकत घेणं शक्य होत नाही,तेव्हा ग्रंथालयं काही माफक रकमेच्या मोबदल्यात आपल्याला ते उपलब्ध करून देतात।एकंदरीत हा साहित्य फराळ पुढचे काही महीने तरी आपली सोय करत असतो।

दिवाळी अंकामधे लिखाण करावं हे तर प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं।त्या निमित्ताने त्याला हव्या त्या विषयावर विस्तृत लेखन करता येतं आणि मोठा वाचकवर्गही मिळतो।माझ्या सारख्या नवोदित लेखकालाही या वर्षी दोन दिवाळी अंकांमधे लिहिण्याची संधी प्राप्त झाली।जेष्ठ पत्रकार श्री अरुण खोरेजी आणि पुण्यातील जेष्ठ वकील शिरीष शिंदेजी यांच्या सहकार्याने हे शक्य झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।

श्री अरुण खोरे यांच्या 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' या दिवाळी अंकात मी रफ़ी साहेबांच्या जन्म गावाविषयीचा माझा अनुभव मांडलेला आहे.काही वर्षांपूर्वी या महान पार्श्वगायकाच्या प्रेमाची ओढ़ मला तिथे घेवून गेली।रफ़ी साहेबांचा ज्यांना सहवास लाभला आहे,अशा काही मंडळींना भेटण्याचा योग या निमित्ताने आला।'लोकशाहीसाठी समंजस संवाद' हे एक उत्कृष्ठ दिवाळी मासिक आहे. स्वत: श्री अरुण खोरे यांनी बिहारच्या निवडणुकीचं केलेलं अप्रतिम विश्लेषण असो किंवा महान गायिका भारत रत्न एम एस सुबलक्ष्मी यांच्या  जीवनाचा आढावा घेणारा लेखिका सुलभाताई तेरणीकर यांचा लेख असो,वाचकांना समृद्ध करणारे असे अनेक लेख या दिवाळी अंकात आहेत।

२०१५ हे 'साहित्य लोभस'चं २३ वं वर्ष।श्री जयंत शिंदे आणि जेष्ठ वकील शिरीष शिंदे यांचं संपादन आणि मार्गदर्शन लाभलेली ही साहित्य मैफल.जेष्ठ लेखक राजन खान,उत्तम कांबळे,द मा मिरासदार अशा दिग्गजांच्या लेखणीने समृद्ध झालेला आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर अचूक प्रकाश टाकणारं मुखपृष्ठ असलेला हा एक उत्तम दर्जाचा दिवाळी अंक म्हणता येईल,यात शंका नाही।
आदरणीय शिरीष शिंदे जी,हे नेहमीच नवोदित साहित्यकारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत।कौतुकाची पाठीवर थाप देवून वेळोवेळी त्यांनी माझाही उत्साह वाढवला आहे,त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।२०१४ च्या 'साहित्य लोभस' मधे मला पहिल्यांदा लिहिण्याची संधी मिळाली।या वर्षी 'माणसाला समजून घेताना' या लेखातून मी माझे विचार मांडले आहेत।मनुष्याने दाखवलेली थोडीशी समजूतदारी कशी त्याच्या सोबत अनेक लोकांचं आयुष्य सुसह्य करू शकते या तत्वाचा आधार घेऊन मी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मला दिवाळी अंकांमधे लेखनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्री अरुण खोरे आणि शिरीष शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' आणि 'साहित्य लोभस' या दोन्ही दिवाळी मासिकांना शुभेच्छा देतो। 
  



              

Wednesday, November 11, 2015

बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोई
जो मन खोजा आपना
मुझ से बुरा न कोई

संत कबीर,आपल्यालाच आपल्यामधे डोकवायला शिकवतात।सदैव दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहायची सवय लागलेल्यांच्या डोळ्यांमधे घातलेलं अति आवश्यक अंजन आहे ते. आपण केलेल्या चूका,आपण मान्य न करता,खुप सहज पणे त्याचा दोष दुसऱ्यावर थोपवतो।स्वत:लाच स्वत: पासून वाचवण्याचा तो एक सोपा मार्ग असतो।सगळी गणितं तिथेच बिघडत जातात।गोष्टी साचत जातात।चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, एवढं साधं सोपं तर उत्तर असतं।पण चांगलं ते माझं आणि चुकीचं ते दुसऱ्याचं, असं म्हणत आपला अहंकार आपल्याला निसरड्या वाटेवर ढकलून मोकळा होतो आणि पुढे तर सगळी दलदलच असते।

आपणच आपल्याला अनेक गोष्टींमधे विभागून घेतो।मी या पक्षाचा,या जातीचा,या प्रदेशाचा असा एकदा स्वत:वर शिक्का मारून घेतला की आपआपल्या बाजूंचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायला आपण मोकळे होतो।चुकीच्या गोष्टींचं केलेलं समर्थन कधी ना कधी आपल्यालाच त्रास दायक ठरतं।शेवटी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असते।जरा सूक्ष्म विचार केला तर सहज ही गोष्ट आपल्या ध्यानात येईल।त्यामुळे विचार करून बोललं पाहिजे,कृती केली पाहिजे।

दिवाळी आहे,घरात दारात दिव्यांची आरास आहे.शुभेच्छांची देवाण घेवाण पण आहे.पण समजूतदारीची एक पणती अजूनही आपल्या मनात तेवण्याची वाट पाहते आहे.चांगल्याचं मनापासून,मन भरून कौतुक करू,चुकलेल्याला योग्य ती वाट दाखवू .एखादी प्रिय वा अप्रिय घटना (वैयक्तिक किंवा सामाजिक) आपल्या सोबत जेव्हा घडते,तेव्हा उगीचच काही घडत नसतं,याचं भान ठेवायला हवं.चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी काही ना काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत हे तत्व लक्षात असेल तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत राहतील यात शंका नाही।छोट्याश्या या अनिश्चित आयुष्यात एवढं तरी संतुलन साधायचा प्रयत्न करू. समाजातील सर्वच घटकांचा थोड़ा थोड़ा का होईना या तराजूला हातभार लागू दे.म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकून आजच्या घडीला रुंद होत चाललेली अविश्वासाची दरी भरून निघायला मदत होईल।

आपल्या उंबरठ्यावर इमानाचा,माणुसकीचा एक दिवा लावताना,त्याचा प्रकाश शेजारच्या घरी पण पडावा।म्हणजे प्रकाशात प्रकाश मिसळून ,भेदभावाचा अंधार दूर होईल । हातात हात येऊन ,माणसाला माणूस जोडला जाईल आणि एका घट्ट बंधनात आपला देश गुंफला जाईल,हीच आशा उराशी बाळगून आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतो।जय हिंद…

मनिष गोखले 
पुणे